[Lokmat]अजितदादा निधनानंतर झालेल्या अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्याने महाराष्ट्राची बदनामी- सुप्रिया सुळे
महाराष्ट्राच्या पोलीस आणि प्रशासनाची एक चांगली ओळख देशात होती, पण दुखवटा काळात झालेला अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की, असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माणुसकी राहिली आहे की नाही. त्या मंत्रालयात दुखवटा असताना असं झालंच कसं हे खूप गंभीर आहे, शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. याबाबत त्यांनी याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्टे दिला आहे असं मला कळालं आहे. हे प्रकरण माध्यमांनी उजेडात आणलं. त्यामुळं तुमचं अभिनंदन आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत एक स्टेटमेंट द्यावं अन् हे झालंच कसं हे सांगावं अशी मागणी करते.
पार्थ पवार प्रकरणावर...पार्थ पवार यांचे प्रकरण न्यायालयात आहे. तपास अहवाल आणि कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार नाही. न्यायालयाचं यावर काय म्हणणं आहे त्यावर आपण कसं बोलणार. या देशात कोर्टाचा निर्णय आपल्या सर्वांना मान्य करावा लागतो. मुख्यमंत्री हे मंत्रालयाचे प्रमुख आहेत. मंत्री हा मंत्री असतो. त्याला पक्षात विभागू नका. ACB कारवाईचे रिपोर्टिंग मुख्यमंत्र्यांना करते. त्यांच्याकडे गृहमंत्रालयही आहे. या गृहमंत्रालयानेच मंत्रालयातील तिसऱ्या,चौथ्या मजल्यावरील त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याकडे एसीबी जाणे हे धक्कादायक नाही का? मग ही तक्रार केली कुणी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

