4 minutes reading time (851 words)

पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेची मोठी पर्वणी मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २८ जानेवारी पासून ही स्पर्धा सुरू होणार असून १४ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेसाठी अकरा हजारापासून तब्बल एक लाखापर्यंतची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा केली.

पुणे जिल्ह्यातील हौशी गायक, कलावंत, भजनी मंडळे यांच्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन व अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'पाणी वाचवा आणि स्वच्छता' या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्पर्धा होत असून विविध सामाजिक विषयांबाबत भजन व अभंगांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

पंडित रघुनाथ खंडाळकर हे या स्पर्धेचे प्रमुख असून विवेक थिटे हे समन्वयक आहेत, तर ह.भ.प. बापूसाहेब मोरे (देहूकर), प्रा. सदानंद मोरे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितिनमहाराज मोरे (देहू), श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र आळंदीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या अनेक कारणांमुळे जागतिक तापमानात बदल होऊन ऋतूचक्र बदलत चालले आहे. त्यामुळे पाऊसही कमी होऊन सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. या प्रश्नावर पाण्याची बचत हा एक प्रमुख उपाय आहे व तो आपण सर्वांनी अमलात आणायला हवा. त्या सोबतच सध्या वाढलेल्या विविध साथीच्या आजारांवर सार्वजनिक स्वच्छता हा एक अत्यावश्यक उपाय असून भारतात त्याविषयी पुरेशी जागरुकता दिसून येत नाही. स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणूनच स्वच्छता आणि पाणी वाचवा या विषयांवर ही स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय स्पर्धेसाठी एकूण ८ केंद्रे निश्चित करण्यात आली असून स्पर्धेची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी राहील. अंतिम स्पर्धा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल. तालुकानिहाय विजयी झालेल्या प्रथम व द्वितीय विजेत्या संघांना अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येईल, असे सुळे यांनी सांगितले.

स्पर्धेची पारितोषिके तालुकानिहाय देण्यात येणार असून प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघास १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्या संघास ११ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ ५ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र (प्रत्येकी ५ संघ) अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अंतिम फेरीत प्रथम क्रमांक येणाऱ्या संघास एक लाख रुपये रोख, महाकरंडक, प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास ७१ हजार रुपये रोख, करंडक, प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकास ५१ हजार रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या एकूण पाच संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असून त्यांना ११ हजार रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे खासदार सुळे यांनी सांगितले. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे  

*स्पर्धेत पात्र होण्यासाठी प्रत्येक संघास स्थानिक लोकप्रतिनिधीचे पत्र आवश्यक (यात सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जि. परिषद सदस्य, आमदार, नगराध्यक्ष यांचे पत्र चालेल).

*स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सहभागी संघास प्रवास आणि इतर खर्चासाठी अडीच हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक संघात कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १० व्यक्तींचा समावेश असावा. (गायक, वादक व कोरस सहीत) स्पर्धेत सर्वांसाठी एकच खुला गट असून स्पर्धकाचे किमान वय १३ वर्षे पूर्ण असावे.

*आपला अभंग वा भजन सादरीकरणाच्या वेळी कुठल्याही प्रकारच्या बॅनर किंवा फलक प्रदर्शनास व अभंग किंवा भजन नाटकीय रुपाने सादर करण्यास परवानगी नाही.

*तबला, पखवाज, हार्मोनियम ही वाद्ये आवश्यक. याशिवाय वीणा, तंबोरा, एकतारी, मृदुंग, खंजिरी/दिमडी व इतर वाद्यांपैकी दोन वाद्ये चालतील. स्पर्धेसाठी एकूण दोन रचना द्याव्यात. त्यामध्ये एक कुठल्याही संत श्रेष्ठींच्या अभंग रचनेपैकी एक व दुसरी पाणी वाचवा अथवा स्वच्छता या विषयी अभंग वा भजनाच्या धर्तीवर स्वतंत्ररित्या रचलेली एक रचना असावी. दोन रचनांसाठी प्रत्येक संघास एकूण १० मिनिटे वेळ दिला जाईल. (अंतिम फेरीसाठी १५ मिनिटे देण्यात येतील.)

*शब्दोच्चार, ताल, स्वर आणि एकूण सांघिक परिणाम याला प्राधान्य दिले जाईल. लोकगीते किंवा चित्रपट गीतांच्या चालींवर आधारित अभंग व भजन ग्राह्य धरले जाणार नाही.

*भजन मंडळाने त्यांना सांगितलेल्या वेळेपूर्वी ३० मिनिटे उपस्थित रहावे व आपली उपस्थिती संयोजकांना कळवावी.

*एका कलावंतास एकाच संघातून सहभागी होता येईल.

*स्पर्धेचा निर्णय स्पर्धा संपल्यावर एका तासाने जाहीर करण्यात येईल.

*परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल.

*प्रवेश, निवड व इतर सर्व बाबतीत अंतिम अधिकार व निर्णय स्पर्धा प्रमुखांचा असेल.

*स्पर्धेदरम्यान आवश्यकतेनुसार प्रासंगिक बदल करण्याचे अधिकार स्पर्धाप्रमुखांनी राखून ठेवले आहेत.

*स्पर्धेची नियमावली व शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संघांवर बंधनकारक राहील.

लुकानिहाय केंद्र, स्पर्धा दिनांक आणि संपर्क प्रमुख पुढील प्रमाणे

इंदापूर तालुका -
इंदापूर २८ जानेवारी २०२४
संपर्क -
अमोल गोळे - ७५८८९ ४१८९०
रजनीकांत भोसले - ९८२२५३६९८९

दौंड तालुका -
दौंड/पाटस ३१ जानेवारी २०२४
संपर्क -
वसंत सोनटक्के - ८६०५४६८४६८
अशोक दिक्षीत - ९१६८६३४२६३

पुरंदर तालुका-
सासवड २ फेब्रुवारी २०२४ ता.
संपर्क -
रविंद्र जाधव - ७५८८०७२५५७
श्रीकांत जाधवराव - ७५८८५९३४०४

हवेली तालुका -
फुरसुंगी ३ फेब्रुवारी २०२४
संपर्क -
गणेश ठाकर - ९८२३३३०५७९
सुनील मते - ७३५०३२३०२७
महेश साळुंके - ९९२२३१०३६९
रविंद्र यादव ९८२३३८९७८३
संदीप महाराज गोगावले - ८३२९२९०३७२

भोर आणि वेल्हा तालुका -
नसरापूर ५ फेब्रुवारी २०२४
संपर्क -
उमेश महाराज शिंदे - ९३५६७२६००१
कृष्णा महाराज लिम्हण - ९९७५४१८८४५

मुळशी तालुका -
पौड ७ फेब्रुवारी २०२४
संपर्क -
बाबाजी शेळके - ९६२३०६४७७७
सोमनाथ साठे - ९९२२४६०१७२

पुणे शहर - ९ फेब्रुवारी २०२४
संपर्क -
नंदकुमार भांडवलकर - ९७६४९०७७५९
अनिल भुजबळ - ९८९००१२७३७
श्रुतिका बोरुडे - ९९६०३००७३४

बारामती तालुका -
मोरगांव ११ फेब्रुवारी २०२४
संपर्क -
नागेश पंडीत सर - ९८५०९८५७९५२
महेंद्र साळवे - ९८६०३५६३८५

महाअंतिम फेरी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी होईल.

निमगाव केतकीच्या मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक: इं...
पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन ...