सत्ता येते-जाते, पण विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवली पाहिजे. कधी सत्तेत असू, तर कधी विरोधात; मात्र संघर्षाची भूमिका सोडता कामा नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होत नसल्याच्या चर्चांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "उद्धवजी भेटत नाहीत, या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. शिवसेनेचा पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते." तसेच यापूर्वी आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्यात आले. आता कोणते नवीन मॉडेल वापरले जात आहे हे माहीत नाही, मात्र जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे, असेही सुळे म्हणाल्या.