[Navarashtra]“सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन!
साताऱ्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर कडाडून प्रहार
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी नेतेच परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील राजकीय वातावरण, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील गोंधळ यावर त्यांनी सरकारला थेट लक्ष्य केले."लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू"सुळे म्हणाल्या, "राज्यात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासक नेमले जात आहेत. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे." सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
"सत्तेसाठी सुरू असलेलं राजकारण राज्यासाठी घातक"
राज्यात सध्या सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बाधा पोहोचवत असल्याचे सुळे यांनी सांगितले. "आमचा संघर्ष विचारांचा आहे, वैयक्तिक सूडाचा नाही," असे त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्षअवकाळी पाऊस, कांद्याला मिळत नसलेला भाव, खतांचा तुटवडा आणि शेतीमालाच्या समस्यांमुळे शेतकरी अडचणीत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. "शेतकरी संकटात असताना सरकारमधील नेते परस्परांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
महिला सुरक्षेवर कठोर भूमिका
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करताना सुळे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली. गंभीर गुन्ह्यांमध्ये जलदगतीने सुनावणी होऊन दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
"२०२९ पेक्षा सध्याचे प्रश्न महत्त्वाचे"भविष्यातील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सध्याच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. "राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि कायदा-सुव्यवस्था हे आजचे खरे प्रश्न आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा१५ ऑगस्टनंतर राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली. औद्योगिकीकरणाबरोबरच वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडेही सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

