2 minutes reading time (411 words)

[Divya Marathi]निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय?

निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय?

इंधनावरील सेस कमी करून जनतेला दिलासा द्या- सुप्रिया सुळे

1 सप्टेंबर उजाडताच महागाईचा नवा फटका बसला असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच होरपळून निघाले आहेत. सिलिंडर, दूध, साखर आणि खाद्यतेलाच्या दरात झालेल्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय झाली आहे का? इंधनावरील कर कमी करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

केंद्राकडून जनतेवर आणखी एक प्रहार

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच महागाईने होरपळून निघाले आहेत. अशातच 1 सप्टेंबर उजाडताच सरकारने विविध घटकांमधील दरवाढ लागू करून जनतेवर आणखी एक प्रहार केला आहे. आजपासून मुंबई आणि परिसरात सीएनजीचे दर ₹ 2 ने वाढून ₹ 88 प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर घरगुती स्वयंपाकाचा गॅस देखील महाग झाला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय आणि खानावळींचे दर वाढून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि ट्रान्सपोर्टचे भाडे वाढले आहे. तसेच दररोज लागणाऱ्या दूधाच्या दरात वाढ झाल्याने नागरीकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. महत्वाचे म्हणजे साखरेच्या दरातही मोठी वाढ झालेली असून ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर अचानक वाढणे हे संशयास्पद असून यातून केवळ सर्वसामान्य जनतेची लूटच होत आहे. गुळ, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. दुर्दैवाने सरकारने आपल्या माध्यमातून यावर अंकुश ठेवणे आवश्यक असताना ते केवळ हाताची घडी, तोंडावर बोट या भूमिकेत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तथाकथित 'अच्छे दिन'चा नारा देणारे सरकार रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी का ठरत आहे? इंधनावरील सेस आणि इतर कर कमी करून जनतेला दिलासा का दिला जात नाही? निवडणुका संपल्या की महागाई वाढवायची ही सरकारची सवय आहे का? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. महागाई तातडीने नियंत्रणात आणणे सरकारला सहज शक्य आहे, पण त्यासाठी तशी इच्छाशक्ती हवी आहे. सरकारने ती दाखवावी ही आमची मागणी आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने प्राधान्याने काम करावे तसेच इंधनावरील कर कमी करावेत आणि सर्वसामान्य जनतेला तातडीने दिलासा द्यावा. 

...

Supriya Sule Demands Fuel Tax Cut; Slams Government Over Inflation

Supriya Sule slams government over rising fuel prices and inflation in Maharashtra. Follow Latest Updates. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच महागाईने होरपळून निघाले आहेत. आजपासून मुंबई आणि परिसरात सीएनजीचे दर ₹ २ ने वाढून ₹ ८८ प्रति किलोवर पोहोचले आहेत.
[Saam TV]‘सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे’ जरांगेंच्...
[Sarkarnama]अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिय...