2 minutes reading time (490 words)

[Deshdoot]भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्‍वास; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्‍वास; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

भाजप (BJP) वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) त्यांच्याच मित्रपक्षांवर होत असलेली टीका पाहता त्यांच्याकडूनच त्यांच्या मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल) अविश्‍वास दाखवला जात असल्याचा सूचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP SP) नेत्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत व त्यात सत्ताधार्‍यांचे योगदान आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खा. सुप्रिया सुळे नगरला (Nagar) आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांनी संवाद साधला. भाजप कोअर कमिटी बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) गट व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने लोकसभेला मदत केली नसल्याचा दावा केला गेला आहे. यावर भाष्य करताना खा. सुळे म्हणाल्या, भाजप नेत्यांची वक्तव्ये वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून मित्रपक्षावर टीका करणे वा त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका कशी होईल, हे पाहणे भाजपकडून सातत्याने सुरू आहे. यातून त्यांच्याच मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल डाऊन करणे) एकप्रकारे अविश्‍वास व्यक्त करण्यासारखे आहे. पण हा त्यांच्या आघाडी वा युतीतील अंतर्गत प्रश्‍न आहे, असे स्पष्ट करून अधिक भाष्य त्यांनी टाळले.

जातीवाद, दंगली वा सामाजिक तेढ महाराष्ट्रात वाढत आहे. पण, केंद्रात भाजपचे सरकार आहे व याच सरकारचा गुन्हेगारी अहवाल सांगतो की, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत व त्यात सत्ताधार्यांचेच योगदान आहे, असे भाष्य करून खा. सुळे म्हणाल्या, मात्र, यामुळे मराठी माणसाचे व महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी घटना वाढल्या असून, क्राईम कॅपिटल शहर झाले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले शहर गुन्हेगारीसाठी देशात प्रसिद्ध होणे, हे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे अपयश आहे, असा दावाही त्यांनी केला.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे ब्रिटीशांकडून आणल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील जे खरे व सत्य आहे, तेच न सांगता लोकांची फसवणूक सुरू आहे, असा दावा करून खा. सुळे म्हणाल्या, ज्या ब्रिटीश म्युझियमकडून सरकारने वाघ नखे आणली, त्याच म्युझियमने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना संबंधित वाघ नखे मूळ (ओरिजनल) आहेत की नाही, हे माहीत नसल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने संबंधित वाघ नखे खरी आहेत की नाही, हे स्पष्टपणे सांगावे. ही वाघनखे पाहण्यासाठी शाळांतील मुले अपेक्षेने जात आहेत. त्यामुळे भविष्यात जेव्हा ही वाघ नखे खरी नाहीत, हे स्पष्ट होईल, तेव्हा या मुलांची ती फसवणूकच ठरणार आहे, असा दावाही खा. सुळेंनी केला. दरम्यान, नीट असो वा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, ती पारदर्शी पद्धतीने व्हावी, अशी मागणी आम्ही संसदेत केली होती. पण त्यावर चर्चाही केली गेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पूजा खेडकर प्रकरणाविषयी बोलताना खा. सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या पाऊस, महागाई, गुन्हेगारी, भ्रष्टाचार असे अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत. पण रोज पूजा खेडकर विषयावर चर्चा सुरू आहे. सरकारने तीन आठवडे घ्यावेत व या विषयाचा एकदाच काय तो अहवाल करून तो जाहीर करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्या ईव्हीएम मशीन तपासणीच्या मागणीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, सत्तेत असलेल्यांचाच ईव्हीएमवर विश्‍वास नसेल तर त्याची दखल न घेणे चुकीचे आहे. 

...

भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्‍वास; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

खा. सुप्रिया सुळे नगरला (Nagar) आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांनी संवाद साधला. भाजप कोअर कमिटी बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) गट व एकनाथ शिंदे...
[ABP MAJHA]सत्तेत असणाऱ्या लोकांचाच EVM वर विश्वास...
[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरका...