[My Mahanagar.]तीन वेळा सराव करूनही…; 15 मतं अवैध ठरल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर जोरदार टीका
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. एनडीएकडे या निवडणुकीसाठी बहुमत होते तरीही इंडिया आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे विजयी आघाडी असल्याचे आकडे दिसत होते. त्यानुसार, सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर क्रॉसवोटिंग आणि अवैध मतदानाप्रकरणी सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे मुख्य प्रतोद संजय जयस्वाल यांच्या वक्तव्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले. किती मतं फुटली? त्यांना जी 15 मतं जास्त मिळाली, ती शिवसेनेचीच होती हे त्यांनी मार्क केलं होतं का? कारण हे मतदान गुप्त होतं. मग त्यांना कसं कळलं की, ती मतं राष्ट्रवादीची होती की शिवसेनेची? कारण काल भाजपाचे वरीष्ठ नेते संजय जयस्वाल यांनी विधान केलं की, 40 मतं फुटली आणि 40 मधली 11 मतं वायएसआर काँग्रेसची आहेत. परंतु वाएसआर काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मित्रपक्ष नाही. कारण गेल्या 5 वर्षांपासून जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात वाएसआर काँग्रेस भाजपाचा मित्रपक्ष आहे. याचा अर्थ भाजपाने त्यांचा मित्रपक्ष बदलला का? कारण जी 40 मतं ते आमच्या माथी मारत आहेत, त्यातली 11 मतं त्यांच्याच मित्रपक्षाची आहेत. याचा अर्थ भाजपा त्यांच्या सोयीने मित्र बदलत आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुप्त मतदान होऊनही कुठल्या पक्षाची किती मतं फुटली, याचे दावे करणे म्हणजे वोटचोरीच आहे. कारण मला मतदानासाठी दिलेल्या कागदावर कुठलाही क्रमांक किंवा रंग नव्हता. तिथे पांढराच रंग चालतो. जर हे गुप्त मतदान होतं, तर मग यांना कसं माहिती की कोणती मतं फुटली? यात काहीतरी गोलमाल दिसतोय. सत्तेतल्या लोकांना जर माहिती आहे की कुणाचं मतदान कुठे झालं, याचा अर्थ ही वोटचोरीच आह, असा गंभीर आरोप करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 14 क्रॉसवोटिंग कोणत्या राज्यातून झालं? जर गद्दारी केली तर ती फक्त मराठी माणसानं केली असा त्यांना आरोप करायचा आहे का? 14 मतं फुटली म्हणजे ती महाराष्ट्राचीच फुटली असं कसं म्हणता? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
अवैध मतदानाप्रकरणी भाजपावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 15 मतं अवैध ठरली आणि त्यातली 10 मतं भाजपाची आहेत, असं तेच (भाजपा) सांगत आहेत. परंतु तीन वेळा त्यांनी मतदानाचा सराव केला. मतदान करताना फक्त एक दांडी काढायची होती. ग्रामपंचायत किंवा कारखान्याच्या मतदानावेळी खूप क्लिष्ट प्रक्रिया असते. त्यावेळी आमचे लोक कसे मतदान करत असतील? असा प्रश्न उपस्थित करतानाच सुप्रिया सुळे म्हणाले की, तीन-तीन वेळा सराव करूनही त्यांचे 10 खासदार कशी चूक करू शकतात? फक्त एक दांडी काढायची होती. त्यातही त्यांच्याकडून चूक कशी होऊ शकते? खरं तर मतं अवैध ठरली हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

