[Sarkarnama]बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखतीपासून दूर राहणार,
मोठं कारण आलं समोर; ट्विटव्दारे दिली माहिती
New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच सर्वसामान्यांच्या विविध मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेत असतात. तसेच राजकीय घडामोडींवरही रोखठोक भूमिका मांडताना दिसून येतात. नुकतीच त्यांनी नवी दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला होता. तसेच लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोग्याबाबत अगदी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी(ता.18) सोशल मीडियाच्या X प्लॅट फॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट आरोग्याबाबत आहे. सुळे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्या पुढील 1 ते 2 आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणं टाळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी (ता.20) सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारला घेरण्यासाठी मोठी रणनीती आखली जात आहे. याचदरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः आरोग्याच्या बाबतीत सोशल मीडियावरून अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात, "माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे 'व्हॉइस रेस्ट' (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिल्याचं सुळे यांनी पोस्टमधून सांगितलं आहे.
तसेच यावर उपाय म्हणून मी 'व्हॉइस थेरपी' घेणार असल्याचंही सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढील 1-2 आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद असं सुळे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या घशाला सूज आल्याचं निदान झाल्यानं त्यांना न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मुख्य जबाबदारी कोणावर सोपवली जाणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
संसदेच्या अधिवेशनात सोनम वांगचुक यांचं आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरण, कॉक्रोच जनता पार्टीनं केलेली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी,राजकीय पक्षांची फोडाफोडी, इथेनॉल निश्चिती धोरण, भ्रष्टाचार, घोटाळे, वाढती महागाई, परराष्ट्र धोरण यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नसल्याचं दिसून येत आहे.

