[My Mahanagar]भाजप सत्तेत असल्यावरच राज्यात वाचाळवीर तयार होतात; सुप्रिया सुळेंची टीका
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्हेगारीच्या घटना कशा घडतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच भाजपा सत्तेत असल्यावरच राज्यात वाचाळवीर तयार होतात, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात. तसेच काहीही बोलून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात, या राज्याचे गृहमंत्री त्यांची पाठराखण करतात हे खरचं दुर्देवी आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच अजित पवार कोणाला तिकीट देणार हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
धारावीच्या परिसरामध्ये एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात होते. त्या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी पालिकेचे पथक शनिवारी धारावीमध्ये पोहोचले होते. मात्र पालिकेचे पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी काही नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यावेळी धारावीच्या माजी आमदार आणि उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड या घटनास्थळी पोहचल्या. त्यानंतर आता धारावीमधील मशिदीची तोडक कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

