[Agrowon]नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवा
रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोमवारी (ता. १४) दिले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यादृष्टीने २०१३च्या भूमिसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. ही मोबदल्याची प्रकरणे गतीने निकाली निघतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील..हवेली, मुळशी, वेल्हा आदी तालुक्यांतील दरडग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, वस्त्या, पाड्यांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागाच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले असून आवश्यक तेथे पुनर्वसन, अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. हवेली तालुक्यातील जांभले या खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात असलेल्या गावातील नागरिकांना व शालेय मुलांना प्रवासासाठी बोट मिळावी या मागणीच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाहीचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.कातकरी कुटुंबांना जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी माहिती दिली. जिल्ह्यात ९ हजार २०० कातकरी कुटुंबे असून, डिसेंबरपर्यंत केवळ १६ कुटुंबांकडे घरे होती. .गेल्या सहा महिन्यांत मोहीम स्तरावर काम करून ९५० कातकरी कुटुंबांना जागा देण्यात आली असून त्यांना घरकुले, नियमानुसार सोईसुविधांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. उर्वरित सर्व कातकरी कुटुंबांना येत्या ऑक्टोबरपर्यंत जमीन देण्याचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

