[NDTV Marathi]'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती
Pune News: पुण्यातील पाषाण तलाव सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून त्यांचा खच तलावाच्या काठी साचला आहे. या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेधले असून महापालिका प्रशासनाच्याही ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.
जैवविविधता धोक्यात, दुर्गंधीने नागरिक हैराणसुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "पुण्यातील पाषाण तलावातील मासे मरण पावले असून त्यांचा खच तलावात पडला आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, विषारी रसायने या तलावात सोडली जात आहेत. त्यामुळे या तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याखेरीज माशांचा खच गेली चार पाच दिवसांपासून पडलेला असल्याने त्यावर आता कीटक घोंघावत असून नागरिकांच्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे".
कठोर कारवाई आणि स्वच्छतेची मागणीया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांना जाहीर विनंती केली आहे. "महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी. या तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. यासोबतच हा तलाव स्वच्छ करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी", अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील पाषाण तलावातील मासे मरण पावले असून त्यांचा खच तलावात पडला आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, विषारी रसायने या तलावात सोडली जात आहेत. त्यामुळे या तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याखेरीज माशांचा खच गेली चार पाच दिवसांपासून पडलेला असल्याने त्यावर आता किटक घोंघावत असून… pic.twitter.com/5JL1IPx2xB
— Supriya Sule (@supriya_sule) April 10, 2026

