[ZEE 24 TAAS]पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला
सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...
पुण्यात पुन्हा कोयता गँगनं हैदोस घातलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला केल्यानं एकच खळबळ उडालीय. रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं असून पोलीस त्यांची शोध घेत आहेत. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. तर सरकार हे फक्त राजकारणात व्यस्थ असून पुण्यातील पोलीस व्यवस्था दुबळी झाल्याची टीका शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलीये. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
गृहमंत्री महोदय, पुण्यात आता गुन्हेगार पोलिसांनाही घाबरत नाहीत का? वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. ही अतिशय गंभीर घटना आहे. शहरात गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून गृहखाते त्यावर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आजची ही घटना त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रीय झाली आहे. पुणे पोलिसांनी कोयता गँगची धिंड काढली होती. मात्र, पोलिसांची अद्याप वचक नसल्याचं पुन्हा घडवून आणलेल्या हल्ल्यानंतर दिसून आलं आहे. अशातच आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागलाय.
विरोधकांनी या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था दाखवणारं आहे. महाराष्ट्रातील जनतेला, महिलांना आणि पोलिसांना चुकवावी लागत आहे. फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

