[Sarkarnama]सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’वरून सुप्रिया सुळे लोकसभेत भडकल्या; अर्थमंत्र्यांकडे मागितला खुलासा
महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या आघाडीतील काही नेत्यांचा उल्लेख 'डर्टी डझन' असा करायचे. ईडीसह विविध तपास यंत्रणांकडून भ्रष्टाचार प्रकरणांचा तपास त्यावेळी सुरू होता. हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.
फायनान्स बिलावर बोलताना सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी म्हणजे ICE. हे केवळ विरोधकांसाठी वापरले जाते. इकडून तिकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमधून बाहेर निघतात. सगळ्या केस काढल्या जातात. मी याचा संपूर्ण डेटा सभागृहात देऊ शकते.
ना खाऊंगा ना खाने दुंगा, असे भाजपकडून सांगितले जाते. मीही प्रभावित झाले होते. पण असे महाराष्ट्रात आणि देशात झाले नाही. महाराष्ट्रात डर्टी डझन ही एक स्टोरी चालायची. भाजपचे वरिष्ठ नेते आरोप करायचे की, एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी. ही पार्टी ओरिजनल असल्याचा दावा ते करत आहेत. असे असेल तर मग ही पार्टी आता त्यांच्या बाजूने आहे. या नॅचरली करप्ट पार्टीचे आणि डर्टी डझनचे काय झाले, यावर अर्थमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी खासदार सुळेंनी केली. इतर विरोधी सदस्यांनीही बाके वाजवून त्याचे समर्थन केले.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणानंतर भाजपचे खासदार निशीकांत दुबे बोलण्यास उभे राहिले. ते म्हणाले, 'हे मोदींचे सरकार आहे, ते आपल्या लोकांनाही सोडत नाही. याच सभागृहातील भाजपच्या सदस्यांवर इन्कम टॅक्सची रेड टाकून 80 कोटी जप्त केले होते. त्यामुळे भाजपचे लोकांची चोरी केली तरी त्यांच्यावरही रेड होईल.'.
काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दुबे यांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दुबे यांनी आधीही प्रियांका गांधी सभागृहाच्या सदस्या नसताना त्यांचे नाव घेत त्या अंबानींच्या विवाह समारंभात उपस्थित राहिल्या होत्या, असे सांगितले. वेणुगोपाल यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. सुप्रिया सुळे यांनीही वेणुगोपाल यांच्या आक्षेपाचे समर्थन करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रियांका गांधी या सभागृहाच्या सदस्य नाहीत. त्या एक महिला आहेत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांच्यावर बोलू नये. ज्या विवाहात पंतप्रधान जाऊ शकतात, इतरांनी जाण्यात काय चूक आहे. त्यामुळे खोटे नॅरेटिव्ह पसरवू नये. भाजपचा हा प्रॉब्लेम आहे. ते खोटे नॅरेटिव्ह पसरवून लोकांची प्रतिमा मलीन करता. शेकडो कुटुंबांची प्रतिमा त्यांनी मलीन केली. माझ्याही कुटुंबाबाबत तेच केले. लोकांना चुकीचे पध्दतीने अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे काय होते, याचा कधी विचार त्यांनी केलाय? ते केवळ सत्तेसाठी हे करत आहेत. अमित शाह म्हणाले होते की, एक बोट आमच्याकडे दाखवत असाल तर तीन बोटे तुमच्याकडे आहेत. आता तेच भाजपलाही लागू होते, असे प्रहार सुप्रिया सुळे यांनी केला.

